बंकटस्वामी

बीड जिल्ह्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनूर या गावी सन १८७७ साली बंकटस्वामी महाराज यांचा रजपूत समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहान असताना त्यांनी गाई सांभाळल्या. इगतपुरी येथे लक्ष्मण वाणी यांच्या दुकानावर काही दिवस काम केले. तेथेच लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची भेट झाली व ते हरी भजनात रमू लागले. एकदा वै. विष्णुबुवा जोग महाराज यांनी स्वामींचे भजन ऐकले. स्वामींचा आवाज व चाली अतिशय गोड होत्या. जोग महाराज यांनी स्वामींना आळंदीला येण्याचा आग्रह केला. स्वामींनीही लगेच होकार दिला व त्यांच्या सोबत आळंदीचा मार्ग धरला. आळंदीला येऊन त्यांनी भंडारा डोंगरावर व भामचंद्र डोंगरावर ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा या ग्रंथांची पारायणे केली. त्याच वेळी वै. विष्णुबुवा जोग महाराज यांनी आळंदीत पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती म. गुरव व बंकट स्वामी महाराज हे सर्व लोक त्या संस्थेचे प्रमुख खांब होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य केले. बंकटस्वामींनी अनेक शिष्य घडविले त्यात संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा, श्रीकृष्ण महाराज लोहिया, माणिक बाबा, नारायण बाबा घोडके, बन्सी महाराज नेवासेकर, बाबूलाल महाराज पाडळीकर, रामकृष्णभाऊ येडशीकर, माधव महाराज सुकाळे(गुरुजी) यांच्यासह अनेक गुणवान कीर्तनकार घडविले.



This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.